ठाणे , दि.१३ (अजय मगरे )
आनंद विश्व गुरुकुल नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी “मरणानंतरही द्या जीवनदान” हा संदेश ठाणेकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी भव्य रॅली व पथनाट्याचे आयोजन केले. अवयवदानाविषयी समाजात सकारात्मक दृष्टिकोन आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाला सोसायटीचे सचिव व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रा. प्रदीप ढवळ, खजिनदार अक्षर परसनीस, ब्र. नाथ पाई कॉलेजचे प्राचार्य श्री. अनिल बोरणारे, विश्वस्त जेष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, महाविद्यालयाच्या प्राचार्या संपदा कुलकर्णी, प्रायमरी विभागाच्या मुख्याध्यापिका डॉ. वैदही कोळमकर तसेच सर्व शाखांचे प्राचार्य उपस्थित होते.

मीनाताई ठाकरे नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थी, सायंकालीन महाविद्यालयातील एनएसएस स्वयंसेवक आणि ए.व्ही.जी. ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. रॅलीसोबत सादर करण्यात आलेल्या लघुनाट्यप्रयोगातून अवयवदानाचे महत्त्व, जीव वाचविण्याची क्षमता आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी “अवयवदान – अमूल्य दान”, “तुमचे एक पाऊल, दुसऱ्याचे आयुष्य” अशा घोषणांनी शहरातील रस्ते दुमदुमवले. अनेक नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले तर काहींनी अवयवदानासाठी नोंदणी करण्याची तयारी दर्शविली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. मयुरी पेंडसे यांनी मानले.
–




















