कोपरगाव, दि. १४ : दिलीप गायकवाड
कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथील शाहिर राजाभाऊ निवृत्ती माळवे (वय ६५) हे गेली चार दशके लोककला, कविता, साहित्य आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून जनजागृतीचा दीप प्रज्वलित ठेवत आहेत. साध्या शेतकरी कुटुंबात पत्नी, मुलगा अमोल राजाभाऊ माळवे आणि विवाहित मुलगी यांच्यासह राहणारे राजाभाऊ माळवे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही कला-संस्कृतीचा वारसा जपला आहे.
१९७६ मध्ये शाहिरी क्षेत्रात पदार्पण करत त्यांनी कोपरगाव येथील ‘मायगाव देवी पोथी,महात्म्य हे लेखन करून स्थानिक सांस्कृतिक इतिहासाची नोंद केली. त्यांचे आजोळ धामोरी येथे असून, आई सोन्याबाई निवृत्ती माळवे यांच्याकडूनच त्यांना लोककलेचे संस्कार मिळाले.
राजाभाऊ माळवे यांच्या कार्याची दखल घेत माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे, सहकारमहर्षी मा. शंकरराव कोल्हे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला आहे. ‘शाहिर’ ही पदवी कोपरगाव परिसरातील लोकांनी प्रेमाने त्यांना बहाल केली. जिल्हा दारूबंदी प्रचार मोहीम (नाशिक १९९६-९७) मध्ये त्यांनी प्रभावी सहभाग नोंदवला. त्यांच्या कार्याबद्दल पुणे येथे विशेष गुणवंत प्रशस्तीपत्र, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे (२००९, २०११) सन्मान, शाहिर दत्ता वाघ लोककला पथक नाशिकचे साहित्य-कला यात्रेचे सन्मानचिन्ह, राष्ट्रीय भोलेनाथ भजनी मंडळ नाशिक-१ आणि सांस्कृतिक व शैक्षणिक विकास मंडळ अकोला यांचे प्रशस्तीपत्र तसेच राज्यस्तरीय साहित्य स्पर्धा (१९९७) मधील प्रथम पारितोषिक अशा अनेक मानपत्रांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
तथापि, इतक्या वर्षांच्या कार्यानंतरही शासनाकडून त्यांच्या योगदानाची दखल घेतलेली नाही. ‘न्यायासाठी झुंज’ ही त्यांची कथा लोकांमध्ये गाजली असून, आजही ते तितक्याच उत्साहाने साहित्य आणि लोककलेची सेवा करत आहेत. सोनार समाजातील राजाभाऊ माळवे यांचा मुलगा मोलमजुरी करून घर चालवतो, तरीही कलेचा ध्यास आणि लोकसंपर्क यांची तळमळ मात्र कायम आहे.




















