मुंबई, दि.३० ( प्रतिनिधी )
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) मार्फत सुरू असलेल्या रस्ते विकास प्रकल्पांना वेग द्यावा, तसेच मुंबई-नाशिक महामार्गावरील रखडलेली कामे मॉन्सूनपूर्वी पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.
राज्यात सुरू असलेल्या विविध रस्ते प्रकल्पांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कामांची गुणवत्ता आणि वेळेच्या चौकटीत पूर्णता या दोन्ही बाबींवर भर दिला. या बैठकीस एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विशेषत: मुंबई-नाशिक महामार्गावरील रखडलेल्या ३१ किमी लांबीच्या काँक्रीटीकरण कामांना गती देण्याचे आदेश देताना, उपमुख्यमंत्र्यांनी पिंपळास चारोटी, रेल्वे ओव्हर ब्रिज यांसारख्या ठिकाणच्या रखडलेल्या कामांचीही नोंद घेतली. “कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारांवर नोटीस पाठवून ताकीद द्या,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला.
रेल्वे पुलाच्या कामासाठी गर्डर आल्यानंतर तत्काळ रेल्वेकडून मेगाब्लॉक घेऊन काम पुढील महिन्याभरात पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच कशेळी येथील खाडीवरील पूल ऑक्टोबरपर्यंत, तर कळवा खाडी पूल जूनअखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्टही त्यांनी समोर ठेवले.
“ठाणे-नाशिक महामार्गावरील वाहतूक येत्या पावसाळ्यात सुरळीत राहील, याची खात्री करा,” असा ठाम आदेश देत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रशासकीय यंत्रणेला कामात कसूर न करण्याचा संदेश दिला आहे.




















