कोपरगांव, दि.२२ : दिलीप गायकवाड
कोपरगांव व राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे आषाढ महिन्यातील कामिका एकादशीनिमित्त लाखो भाविकांनी श्री श्रेष्ठ संत योगिराज चांगदेव महाराजांच्या समाधी स्थळावर दर्शनासाठी गर्दी केली. मात्र, यात्रेसाठी कोणतेही पुरेसे नियोजन नसल्यामुळे भाविकांचे हाल झाले. रस्त्यावर वाहतुकीची कोंडी, रेल्वे रुळावरून धोकादायक पद्धतीने ये-जा करणारे लोक, पिण्याच्या पाण्याचा अभाव, उपवासाची अन्नव्यवस्था नसणे, लाऊडस्पीकरवर केवळ दान मागणाऱ्या घोषणा आणि कुठेही पोलीस अथवा प्रशासनाचा ठसा न दिसणे अशी परिस्थिती होती.

आषाढी एकादशीनिमित्त पुणतांबा हे नेहमीच वारकरी संप्रदायासाठी श्रद्धास्थान राहिले आहे. आजच्या दिवशी कोपरगांव, राहाता, श्रीरामपूर, येवला आदी तालुक्यांतून हजारो भाविक येथे दाखल झाले होते. दुपारनंतर गर्दी शिगेला पोहोचली. मात्र, पुरेशा पोलीस बंदोबस्ताअभावी रस्त्यावर वाहतुकीचा विस्कळीत कारभार दिसून आला. रेल्वे रुळ धोकादायक पद्धतीने लोक ओलांडत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
मंदिर परिसरात उपवासाच्या पदार्थांची तसेच साध्या पिण्याच्या पाण्याचीही कुठलीही सोय नव्हती. काही भाविक थोडीफार अन्नधान्य वाटताना दिसले तरी प्रशासनाकडून कोणतीही व्यवस्था नव्हती. मंदिराभोवती बॅनरबाजी, नेत्यांचे प्रचार बोर्ड लागलेले होते, मात्र भाविकांच्या गरजा कोणाच्या लक्षात आल्या नाहीत.
शिर्डीच्या तुलनेत पुणतांबा हे जागृत तीर्थक्षेत्र असूनही येथे अद्याप मूलभूत सुविधा पोहोचल्या नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. ‘काशी समान पुण्यभूमी’ मानल्या जाणाऱ्या पुणतांब्याची अशी दुरवस्था पाहून अनेक भाविक नाराजी व्यक्त करत होते. येथेच कार्तिकस्वामींचे ज्योतिर्लिंग मंदिर, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या उपस्थितीत पार पडलेला सामिधा सोहळा आणि साईबाबांचे पाय लागलेली जागा असूनही शिर्डीच्या धर्तीवर येथे काहीच सुधारणा झाल्या नाहीत, याबद्दल अनेकांनी खंत व्यक्त केली.
प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी यापुढील यात्रांसाठी योग्य नियोजन करावे, भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा बहुजन शक्ती संस्थेकडून व्यक्त होत आहे.




















