कोपरगाव : दिलीप गायकवाड
कोपरगाव शहरातील लहान्या पुलावर गुरुवारी (दि. ४) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनचालक व नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. बेट व मोहनीराज नगर परिसराला कोपरगाव शहराशी जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
वाहतूक सुरळीत करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस घटनास्थळी तैनात होते आणि वाहतुकीचे नियोजन करत होते. महामार्गावरील सुरू असलेली रस्त्याची कामे तसेच साईबाबा कॉर्नर येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे काही वाहतूक कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्याकडे वळविण्यात आल्याने कोंडीची समस्या अधिक गंभीर झाली असल्याचे समजते.
भर दुपारच्या कडक उन्हात वाहनांमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. यामुळे संतप्त नागरिकांनी प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी व्यवस्था आणि प्रभावी नियोजन करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.




















