कोपरगाव, दि.१४ : दिलीप गायकवाड
महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ असा एकूण १२ गड-किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या गौरवामुळे कोपरगाव शहरात भाजप व शिवप्रेमींच्या वतीने उत्साहात जल्लोष करण्यात आला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत उपस्थितांनी आनंद व्यक्त केला. गड-किल्ले हे इतिहास, संस्कृती, शौर्य आणि धैर्याचे प्रतीक असून, जागतिक पातळीवर यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल अभिनंदन करत सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
या प्रसंगी विविध शिवप्रेमी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी ‘शिवाजी महाराज की जय’, ‘गड किल्ल्यांचा जयघोष’ अशा घोषणा देत परिसर दुमदुमवला. युनेस्कोच्या निर्णयामुळे महाराष्ट्राची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा पुन्हा एकदा जागतिक नकाशावर अधोरेखित झाल्याचे वक्तव्य यावेळी काही मान्यवरांनी केले.
यावेळी उपस्थितांनी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या वैभवात भर घालणाऱ्या या ऐतिहासिक क्षणाचा आनंद साजरा करत युनेस्कोचे आभार मानले.




















