ठाणे, दि. ९ : अजय मगरे
स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत उभारण्यात आलेल्या कोपरी वॉटर फ्रंट डेव्हलपमेंट या प्रकल्पाचा अवघ्या अडीच वर्षांतच फज्जा उडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून उभारलेल्या या प्रकल्पात निकृष्ट दर्जाची कामे व भ्रष्टाचार उघड झाल्याचा ठपका ठेवत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता राहुल पिंगळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

या प्रकल्पाअंतर्गत शौचालय, अॅम्पी थिएटर, उद्यान, वाहनतळ, जेट्टी रस्ता नूतनीकरण, ऐतिहासिक तोफांसाठी चौथरा व दशक्रियेसाठी घाट अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र अत्यल्प कालावधीतच या सर्वच सुविधा मोडकळीस आल्या आहेत. अॅम्पी थिएटरला तडे, बाकड्यांची मोडतोड, तोफांचा चौथरा उखडलेला – अशी परिस्थिती ठाणेकरांना पाहायला मिळत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे.
पिंगळे यांनी याबाबत गंभीर आरोप करताना म्हटले की, “निकृष्ट दर्जा, ढिलाई आणि भ्रष्टाचारामुळे प्रकल्पाची ही दुर्दशा झाली आहे. संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत होणाऱ्या कामकाजावर यापूर्वीही
गंभीर आरोप झाले आहेत. केंद्रीय नागरी विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी चौकशीचे आदेश दिले होते, मात्र ठोस कारवाई न झाल्याने भ्रष्टाचाराला खतपाणी मिळाल्याचे काँग्रेसकडून नमूद करण्यात आले आहे.
नागरिकांच्या पैशांचा अपव्यय, महापालिकेची मलिन प्रतिमा आणि प्रकल्पाचा झालेला फज्जा ; या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका काय असणार, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.




















