कोपरगाव, दि. १६ : दिपक साटोटे
कोपरगाव तालुका पोलिसांनी गोदावरी नदी पात्रातून बेकायदा वाळू उत्खनन करून वाहतूक करणाऱ्या टोळीवर कारवाई करत तब्बल ५५ लाख ५० हजार रुपये किमतीची वाहने जप्त केली आहेत. या कारवाईत ४ जणांना रंगेहात पकडण्यात आले असून ३ जण अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.
पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी ही धडक कारवाई केली. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी संगनमत करून गोदावरी नदी पात्रातून शासकीय वाळू बेकायदा उत्खनन करून चोरीस नेऊन विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना पोलिसांच्या कारवाईत सापडले.
यातील चार आरोपी घटनास्थळी आढळून आले. तर तीन आरोपी हे पोलिसांची कारवाई पाहताच अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. तसेच दोन आरोपींनी आपल्या वाहनातील वाळू पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नदी पात्रात टाकून दिली.
कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.




















