पालिकेच्या ढिसाळ कारभारावर रहिवाशांचा संताप….
धारावी, दि. १ : मंगेश म्हात्रे
धारावी-माहीम फाटक येथील नाल्यावर उभारला जाणारा पूल गेल्या चार वर्षांपासून अर्धवट अवस्थेतच अडकून पडला असून, मुंबई महापालिकेच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. या पुलाची केवळ एकच बाजू ऑक्टोबर महिन्यात सुरू करण्यात आलेली असून दुसऱ्या बाजूचे काम अद्याप रखडले आहे.
पालिकेच्या जी/नॉर्थ विभागाने धारावी मेन रोड आणि माहीम फाटक यांना जोडणारा पूल २०२१ मध्ये “धोकादायक व पुलाचे रुंदीकरण” या नावाखाली हा पूल बंद करण्यात आला होता. त्यावेळी पालिकेने २०२३ पर्यंत काम पूर्ण होईल असे सांगितले होते, मात्र २०२५ वर्ष संपत आले तरी पूल अजूनही अर्धवट आहे. नाल्यावर फक्त पत्रे टाकून ठेवले असून दुसऱ्या मार्गिकेचे बांधकाम सुरू झालेले नाही.
मुंबई महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा हा उत्तम नमुना आहे,” अशी प्रतिक्रिया या पुलाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे कार्यकर्ते गुड्डू शेख यांनी बहुजन शक्ती न्यूज’ला दिली.
“हा पूल प्रत्यक्षात धोकादायक नव्हता, तरी पालिकेने तो पाडून रुंदीकरणाचे काम सुरू केले. एकाच बाजूचे उद्घाटन ऑक्टोबरमध्ये स्थानिक आमदारांनी केले, पण आता त्या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कारण सायन पूल बंद असल्याने तेथील वाहतूक धारावी ६० फूट रस्त्यावर वळवण्यात आली आल्याने या ठिकाणी नागरिकांना चालताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते” असे ते म्हणाले.
गुड्डू शेख पुढे म्हणाले, “अर्धवट पूल बांधून ठेवला, या पुलाचे बांधकाम संथ गतीने सुरू आहे. ठेकेदार काहीच माहिती देत नाही सदर ठिकाणी पूल बांधकामांचा कोणताच फलक लावण्यात आलेला नाही,जो भाग वापरात नाही तो गंजून गेला तर त्याची जबाबदारी महापालिकेवरच राहील. निधीचा अपव्यय टाळायचा असेल तर पालिकेने दुसऱ्या मार्गिकेचे काम तातडीने पूर्ण करावे.”
स्थानिक रहिवासी प्रविण मुंढे, अब्दुल गनी कुरेशी आणि महमद अली नागोरी यांनीही या पुलाचे उर्वरित काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली आहे.




















