टिटवाळा, दि.१३.( अजय मगरे )
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त टिटवाळ्यातील रेजन्सी सर्वम ३१,३२,३३,३४ कॉलनीत उत्साहाचा आणि जल्लोषाचा माहोल पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ११ ते १४ एप्रिल दरम्यान हा भव्य जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात असून कॉलनीतील रहिवाशांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.

मंगल मैत्री प्रतिष्ठान उत्सव समितीच्या वतीने आयोजित या सोहळ्यात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल आहे. ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आयु. आबा मुळीक यांचे एकपात्री नाटक सादर करण्यात आले, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
१२ एप्रिल रोजी आयु. सुरेखा पैठनेताई यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिंदू कोड बिलासह संविधानिक हक्कांवर सखोल प्रबोधन करण्यात आले. तसेच लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये बालचिमुकल्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.
या जयंती उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंगल मैत्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते भगवान धुळधुळे, विजय मोहिते, प्रीतम निकम, रवींद्र भालेराव, युवानंद मेश्राम,ज्ञानेश्वर भंडारे, राहुल बनसोडे, जयदीप वैराळ, भालेराव, हरीश गजबीये, अक्षय मोहिते, संकेत येलवे, स्वनिल सावंत यांनी परिश्रम घेतले. अध्यक्ष मिलिंद सावंत, अभय कदम आणि बहुजन शक्तीचे अध्यक्ष सुनिल मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा उत्साहात पार पडत आहे.
संपूर्ण कॉलनीत जयंती निमित्ताने सणासुदीचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि विचारजागृतीचा संदेश या निमित्ताने दिला जात आहे. टिटवाळ्यातील हा भीम जयंती उत्सव नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे.




















