प्रमाणपत्रांअभावी योजनांचा लाभ मिळण्यात अडथळे; शासन करणार विशेष सर्वेक्षण व प्रमाणपत्र वाटप….!
मुंबई, दि. २९ ( प्रतिनिधी )
राज्यातील दिव्यांग व्यक्तींना आवश्यक त्या शासकीय योजना, सवलती, शिक्षण, नोकरी व आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा यासाठी त्यांचे सर्वेक्षण करून प्रमाणपत्रांचे वितरण करण्याची विशेष मोहीम राबवावी, असे निर्देश दिव्यांग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत.
दिव्यांग कल्याण विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मंत्री सावे यांनी विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश थविल, उपसचिव सुनंदा घड्याळे आणि विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सावे यांनी स्पष्ट केले की, “दिव्यांग व्यक्तींना अपंगत्व प्रमाणपत्र नसल्याने शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यात मोठ्या अडचणी येतात. ही अडचण दूर करण्यासाठी विभागाने आरोग्य विभागाच्या सहकार्याने प्रमाणपत्र वाटपासाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत.”
स्वरोजगार आणि रोजगार धोरणाची तयारी
दिव्यांग बांधवांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासन स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार असून, दिव्यांगांच्या रोजगारासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्यात येणार आहे. “महाराष्ट्र हे दिव्यांगांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करणारे पहिले राज्य आहे. त्यांच्या आर्थिक मदतीसाठी शासन सकारात्मक असून लवकरच निधीवाढीबाबत निर्णय घेतला जाईल,” असे सावे यांनी यावेळी सांगितले.
दिव्यांगांसाठी सक्षम पावले उचलणार – मंत्री सावे
“दिव्यांग बांधवांना केवळ सवलती नव्हे तर सक्षम आणि स्वाभिमानी जीवन जगता यावे यासाठी शासन कटिबद्ध आहे,” असे प्रतिपादन करत मंत्री अतुल सावे यांनी आगामी काळात अधिक प्रभावी योजनांची अंमलबजावणी केली जाईल असे आश्वासन दिले.




















