मुंबई, दि.१७ : अजय मगरे
बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणाऱ्या बौद्ध समाजाने आता आपल्या पवित्र धरोहरांच्या ताब्यासाठी आरपार लढ्याचा नारा दिला आहे. भंते अनागारिक धम्मपाल, पेरियार स्वामी जयंती आणि भय्यासाहेब आंबेडकर स्मृतीदिनाचे औचित्य साधून दिनांक १७ सप्टेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या भव्य जनआक्रोश मोर्चात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया आणि समता सैनिक दलाचे प्रमुख डॉ. भीमराव आंबेडकर यांनी सरकारला इशारा दिला की – “महाबोधी महाविहार, महू जन्मभूमी आणि नागपूर दीक्षाभूमी सरकारने आमच्या हाती दिल्याशिवाय बौद्धजन स्वस्थ बसणार नाहीत.”

तीन प्रमुख मागण्या
मोर्चात डॉ. आंबेडकर यांनी तीन ठोस मागण्या मांडल्या :
महाबोधी महाविहार, बोधगया – बिहार सरकारचा १९४९ चा बोधगया मंदिर कायदा हा बौद्धांच्या हक्कांवर अन्याय करणारा असून त्याचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्ध समाजाकडे द्यावे.
महू जन्मभूमी – बाबासाहेबांच्या जन्मस्थळी उभारलेल्या स्मारकाचे व्यवस्थापन दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाकडे सोपवावे.
नागपूर दीक्षाभूमी – मूळ सरकारी संमतीपत्रानुसार हा परिसर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाला द्यावा व पार्किंगच्या नावाखाली केलेले विद्रूपीकरण तत्काळ थांबवावे.
आंबेडकरी नेत्यांचा पाठिंबा
या आंदोलनाला रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध आंबेडकरी संघटनांनी एकजुटीने पाठिंबा दिला.
मोठ्या संख्येने उपस्थिती
मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगडसह महाराष्ट्रभरातून तब्बल पाच हजार कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने आझाद मैदान गाजवले. महिलांचीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला गेला.
डॉ. भीमराव आंबेडकरांचा इशारा
“आता आमच्या कक्षा वाढवाव्या लागतील. मौर्य, कुशवाह, यादव यांच्याशी संवाद साधून सत्तेत यावे लागेल. तेव्हाच आपण आपली धरोहर वाचवू शकू,” असे परखड उद्गार डॉ. भीमराव आंबेडकर यांनी काढले.
या ऐतिहासिक आंदोलनामुळे महाराष्ट्रात तसेच देशभरात बौद्ध समाजाच्या हक्कांचा प्रश्न पुन्हा पेट घेताना दिसतो आहे. सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.




















