मुंबई, दि. १५ : अजय मगरे
महाराष्ट्रातील पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला चालना देण्यासाठी पर्यटन विभागातर्फे मोठा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून तब्बल १५ हजार युवक-युवतींना विशेष कौशल्य प्रशिक्षण देण्याची योजना आखण्यात आली आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री शंभुराज देसाई यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीत पर्यटन मंत्री देसाई म्हणाले की, “पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाल्यास पर्यटन क्षेत्रात रोजगारनिर्मिती होईल. यामुळे राज्यातील पर्यटन उद्योगाला गती मिळेल.”
यासाठी कौशल्य विकास विभागाशी समन्वय साधून प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. शासनाची मान्यता मिळाल्यानंतर प्रथम टप्प्यात १५ हजार युवकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
बैठकीला पर्यटन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल तसेच टीएचएस कौन्सिलचे संचालक राजीव कांत उपस्थित होते.
पर्यटनमंत्री देसाई यांनी सांगितले की, पर्यटन विभागाच्या अखत्यारित असलेल्या रिसॉर्ट्समधील अधिकारी व कर्मचारी यांनाही या प्रशिक्षणात सामावून घेण्यात येईल. तसेच या क्षेत्रात कार्यरत विविध संस्थांचा अभ्यास करून त्यांचे सहकार्य घेण्यावर भर देण्यात येईल.




















