मुंबई : अजय मगरे
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेला शाईहल्ला, धक्काबुक्की आणि शिवीगाळ हा भ्याड प्रकार असून तो वारकरी संप्रदायाचा अपमान असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
गांधी भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, विकास लवांडे हे वारकरी संप्रदायातील समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा विचार पुढे नेणारे कार्यकर्ते आहेत. वारकरी संप्रदायात मनुवादी विचार वाढत असल्याची त्यांनी व्यक्त केलेली चिंता या हल्ल्यामुळे खरी ठरली आहे. या प्रकरणामागे भाजपची चिथावणी असल्याचा आरोप करत भाजपा सरकार अशा प्रवृत्तींना संरक्षण देत असल्याचेही त्यांनी म्हटले.
सपकाळ यांनी पुढे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख करत मनुवादी विचारसरणीवर जोरदार टीका केली. दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांमागील विचारसरणीही हीच असल्याचा आरोप त्यांनी केला.
नाशिकमधील टीसीएस प्रकरणावर बोलताना सपकाळ यांनी या प्रकरणातील एफआयआर सार्वजनिक करण्याची मागणी केली. “कायद्याने आपले काम करावे, मात्र या प्रकरणाच्या माध्यमातून धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला. “एवढे दिवस पोलिस काय करत होते? या प्रकरणाला सरकारकडून हवा दिली जात आहे का, हे स्पष्ट झाले पाहिजे,” असेही ते म्हणाले.
दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध निवडून आलेले शिवसेना नेते अंबादास दानवे आणि आमदार मिलिंद नार्वेकर यांनी गांधी भवन येथे सपकाळ यांची सदिच्छा भेट घेत काँग्रेसने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले.
यावेळी महाविकास आघाडीच्या आगामी राजकीय वाटचालीवर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. राज्यातील भाजप-महायुती सरकारच्या लोकविरोधी आणि संविधानविरोधी धोरणांविरोधात महाविकास आघाडी एकजुटीने संघर्ष सुरू ठेवेल, असा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभिजीत सपकाळ यावेळी उपस्थित होते.














