शिर्डी, दि.२१.दिलीप गायकवाड
शिर्डी येथे बेकायदेशीर आणि विनावापर विटभट्ट्यांविरोधात छावा क्रांतिवीर सेनेने रणशिंग फुंकले असून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून बेमुदत अमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात संताप व्यक्त करत आंदोलनकर्त्यांनी ठोस कारवाईची मागणी लावून धरली आहे.
या आंदोलनाचे नेतृत्व अविनाश अशोक शिंदे करत असून छावा क्रांतिवीर सेनेचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपोषणात सहभागी झाले आहेत. पिंपळवाडी परिसरातील असंख्य बेकायदेशीर विटभट्ट्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले की, २६ जानेवारी २०२६ रोजी ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. तसेच विटभट्ट्यांवर बालमजुरीच्या घटनांमध्ये संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात आलेली नाही. अल्पवयीन मुलाच्या मृत्यूच्या प्रकरणातही प्रशासनाने मौन बाळगल्याचा आरोप करण्यात आला.
विटभट्ट्यांमधून निघणारा धूर, धूळ आणि प्रदूषणामुळे शेती पिके, झाडे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. श्वसनासंबंधी आजार वाढत असल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. बालमजुरी रोखण्यासाठी तातडीने सर्वेक्षण करून कठोर उपाययोजना कराव्यात, तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा छावा क्रांतिवीर सेनेने दिला आहे. तसेच या आंदोलनाला बहुजन शक्ती संघटनेने पाठिंबा दिला आहे.
शिर्डीत सुरू झालेले हे उपोषण आता प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरण्याची चिन्हे आहेत.




















