कोपरगाव,दि.२१ : दिलीप गायकवाड
शिर्डी, कोपरगाव, आहिल्यानगर-मनमाड महामार्गावर गेल्या आठवडाभरात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचल्याने व मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सावळी विहार, समृद्धी महामार्ग सर्कल, तिनचारी, पुणतांबे फाटा या परिसरातील रस्त्यांची परिस्थिती सर्वाधिक बिकट असून, वाहने चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. बेटनाका परिसरात अनेक वाहनांचे इंजिन खराब झाल्याचे दिसून आले. त्यात भर म्हणून गोदावरी नदीवरील पुलाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने वाहतूक कोडी अधिकच तीव्र झाली आहेत.
साईबाबा कॉर्नर ते येवला नाका या दरम्यान रस्त्याचा सिमेंट रस्ता बनवला असला तरी बाजूने भराव न झाल्याने वाहने वारंवार खाली घसरून अपघात घडत आहेत. पुणतांबे फाटा, जगताप पेट्रोल पंप, भाबड वस्ती, जुनी गंगा, जंगदबा माता मंदिर या भागांत झालेल्या अपघातांत काही नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अशीच अवस्था बेटनाका, शुक्राचार्य मंदिर परिसर, कातकडे पेट्रोल पंप ते कांचनवाडी नाका दरम्यान दिसून येते.
वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेकवेळा प्रवाशांना रात्री रस्त्यातच थांबावे लागते. या वेळी स्थानिक लोकांकडून वाहनचालकांची लूट किंवा अन्य प्रकार घडतात, अशीही तक्रार चालकांनी केली आहे.
याबाबत बहुजन शक्ती न्यूजशी बोलताना वाहनचालकांनी शासनाने तातडीने या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी पावले उचलावीत, तसेच रात्रीच्या वेळी सरकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी केली आहे.




















