कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आंदोलनाची चेतावणी; प्रशासन व साखर आयुक्त यांच्याकडे तक्रार
कोपरगाव, दि. १. ( दिलीप गायकवाड )
शिवरस्ता अडविल्याने पिकांची वाहतूक ठप्प झाली असून नोंदणी करूनही ऊस तोडून नेण्यात आले नसल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करत कोळगाव थडी येथील शेतकरी संतोष जनार्दन निंबाळकर यांनी १ मे २०२६ रोजी कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच साखर आयुक्त, पुणे यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.

निंबाळकर यांच्या निवेदनानुसार, कोळगाव थडी, कोळपेवाडी व माहेगाव देशमुख परिसरातील शिवरस्ता अडवण्यात आल्यामुळे शेतातील पिकांची वाहतूक करणे अशक्य झाले आहे. रस्ता मोकळा नसल्याने उस व गहू यांसारखी पिके काढणे आणि बाजारात नेणे अडचणीचे झाले आहे. परिणामी शेतातील उभा उस सुकत चालल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
यासोबतच, सन २०२५-२६ हंगामासाठी त्यांच्या वडिलांच्या नावे गट नं. ११९ मधील दोन एकर ऊसाची नोंदणी सहकार महर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि. सहजानंदनगर कोपरगांव, व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना लि.गौतमनगर कोपरगांव या दोन्ही कारखान्यांकडे करण्यात आली होती. मात्र फेब्रुवारी २०२६ अखेरपर्यंत ऊस तोड देण्यात आली नसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. “नोंदणी करूनही ऊस तोडला जात नसल्याने माझी फसवणूक झाली असून संबंधितांवर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
निंबाळकर यांच्या वडिलांचे वय ७५ वर्षे असून स्वतःचा पाय अपघातात जखमी झाल्यामुळे धावपळ करणे शक्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. शिवरस्ता तात्काळ मोकळा करून ऊस तोड पथक पाठवावे, अन्यथा १ मे २०२६ रोजी कोपरगाव तहसील कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे .याबाबत महाराष्ट्र राज्याचे,मुख्यमंत्री,मुख्य सचिव,आहिल्यानगर जिल्ह्यधिकारी, अप्पर जिल्ह्यधिकारी,आहिल्यानगर पो.अधिक्षक, प्रांत अधिकारी,शिर्डी ,पो.उप.अधिक्षक कोपरगांव ता.तहसीलदार, कोपरगांव पोलीस.ठाणे,ग्रामीण व शहर यांना निवेदन देण्यात आले आहे.
दरम्यान, या दुहेरी प्रश्नांमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून प्रशासन व संबंधित साखर कारखान्यांची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















