एसआरए प्राधिकरणाने पुढील १५० दिवसांसाठी सज्ज राहावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जनता दरबार व ‘विश्वेश्वरैया’ कॉन्फरन्स कक्षाचे उद्घाटन
मुंबई, दि. २३ मे (मंगेश म्हात्रे )
मुख्यमंत्री सुधारणा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या ‘१०० दिवसांचा ७ कलमी कृती आराखडा’ अंतर्गत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबई (एसआरए) कार्यालयाने राज्यातील ९५ मंडळ कार्यालयांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशस्वी कामगिरीनंतर आता ‘१५० दिवसांचा कृती आराखडा’ राबविण्यात येणार असून, त्यासाठी प्राधिकरण अधिक जोमाने कार्य करील अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

“एसआरएची ही उल्लेखनीय कारकीर्द प्रशासनाची जबाबदारी वाढवणारी आहे. एसआरएची विश्वासार्हता व प्रतिमा आणखी उंचावण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे,” असे आवाहनही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केले.
दि. २३ मे रोजी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बृहन्मुंबई कार्यालयाला भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित निर्णय घेता यावा यासाठी ‘जनता दरबार’ तसेच अभियंत्यांच्या चर्चेसाठी ‘विश्वेश्वरैया अभियंता वास्तुविशारद कॉन्फरन्स कक्ष’ यांचे उद्घाटन केले.यावेळी प्रकल्पबाधित लाभार्थ्यांना सदनिकांच्या चाव्या, वारस पत्रे आणि पती-पत्नीच्या संयुक्त नोंदीसह परिशिष्ट दोनच्या प्रमाणित प्रतींचे वितरण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी एसआरए’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर,आमदार दिलीप लांडे, मुख्य अभियंता रामा मिटकर, उपजिल्हाधिकारी वंदना गेवराईकर, मिळकत व्यवस्थापक स्वप्ना देशपांडे, कार्यकारी अभियंता दिनेश महाजन,प्रवीण पवार यांच्यासह प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















