कोपरगाव, दि.२९ ( दिलीप गायकवाड )
कोपरगावजवळील नगर-मनमाड महामार्गावर आज सकाळी एक मोठा अपघात थोडक्यात टळला. राजस्थानमधील भिलवाडा येथून पुण्याकडे निघालेली होल्हा कंपनीची खाजगी बस कोपरगावजवळील बेट व कांचनवाडी नाका परिसरात आज ( ता.२९ ) सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान महामार्गालगत दरीत कोसळण्यापासून थोडक्यात बचावली.

स्थानिक वाहतूक कोंडीमुळे बसचालकाने नव्याने तयार होत असलेल्या मार्गावर बस वळवली. मात्र, त्या ठिकाणी कोणतेही सूचना फलक नसल्यामुळे आणि इतर लहान वाहने जात असल्याचे पाहून बसचालकाने बस त्या रस्त्याने नेली.
पावसामुळे रस्ता भिजलेला आणि खचलेला असल्याने बस घसरू लागली. बस उलटण्याचा अंदाज घेताच चालकाने सतर्कतेने सर्व प्रवाशांना खाली उतरवले.
बसमध्ये लहान मुले, वृद्ध आणि महिला अशा सुमारे ५०-५५ प्रवाशांचा समावेश होता. वेळेवर सर्वांना खाली उतरविल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. अन्यथा, रस्त्याच्या खाली खोल दरी असल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता होती.

या संकटप्रसंगी बेट येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल परदेशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी सांगितले की, “प्रवाशांचे प्राण वाचले, हेच खरे सौभाग्य. बस दरीत कोसळली असती, तर चित्र वेगळेच दिसले असते.” प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या मार्गावर सुरक्षिततेसाठी आवश्यक ती पावले उचलावी, अशी मागणीही त्यांनी केली.
बस बाहेर काढण्यासाठी बोलावण्यात आलेल्या जेसीबी मशीनसुद्धा गाळात अडकली होती. अनेक प्रयत्नांनंतर ती मशीन बाहेर काढण्यात आली आणि बसला सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.या घटनेनंतर नव्याने उभारल्या जाणाऱ्या मार्गांवर सूचना फलक व सुरक्षिततेची योग्य सोय करणे अत्यावश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. जनतेने याबाबत तत्काळ लक्ष देण्याची मागणी केली आहे.




















