कोपरगाव, दि.२९ : दिलीप गायकवाड
कोपरगाव येथील नगर-मनमाड महामार्गालगत दोन्ही बाजूंनी बांधण्यात आलेल्या गटार नाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गटाराच्या प्रवाहाची योग्य दिशा न ठेवल्यामुळे घाण पाणी थेट शेजारील शेतात शिरत असून, हा “सरकारचा शेतकऱ्यांविरोधातील डाव” असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव भाबड यांनी केला आहे.

भाबड म्हणाले की, कोकमठाण व जेऊर कुंभारी गावातील पावसाचे पाणी पूर्वी जुन्या गंगा नदीमार्गे वाहून जात होते. मात्र, नव्याने बांधण्यात आलेल्या नाल्यामुळे हे पाणी आता महामार्गालगत पुणतांबा फाट्यावर अडवले जात असून, तेथून थेट शेतात शिरत आहे. परिणामी शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, गटाराचे पाणी जुन्या गंगा नदीकडे वळवले जावे, यासाठी शासनाने ठेकेदार, सल्लागार व संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. मात्र, प्रकाश गायकवाड (सल्लागार), मॅनेजर रुपनर, जमाले आदी अधिकाऱ्यांकडे ही बाब निदर्शनास आणून दिली असताना, त्यांनी यावर सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसून आलेले नाही.
याशिवाय महामार्ग रुंदीकरणामध्ये माझी संपुर्ण विहर जात असून त्याचा अद्याप मोबदला मिळालेला नाही, याकडेही भाबड यांनी लक्ष वेधले. नैसर्गिक नाले आणि पाण्याच्या वाहत्या वाटा बंद झाल्यामुळे शेती पाण्यात बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
“सरकारने केवळ कार्यालयात बसून कागदावर रेषा न ओढता, प्रत्यक्ष मैदानात येऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा. अन्यथा आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरण्यास भाग पडू,” असा इशाराही शेतकरी वर्गाने दिला आहे.




















