मुंबई, दि.१६ : अजय मगरे
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील तुळशी तलाव (दि १६)सायंकाळी नेमक्या ६.४५ वाजता ओसंडून वाहू लागला आहे, अशी माहिती पालिकेच्या जल अभियंता खात्याने दिली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्यात वसलेला तुळशी तलाव हा महानगरपालिकेच्या भांडूप जलशुद्धीकरण केंद्राच्या नजीक स्थित आहे. या तलावाची कमाल उपयुक्त साठवण क्षमता ८०४.६० कोटी लिटर असून गतवर्षी (२०२४) तो २० जुलै रोजी भरून वाहू लागला होता.
दरम्यान, मुंबईला पाणीपुरवठा करणा-या सातही तलावांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता १,४४,७३६.३ कोटी लिटर आहे.
आज पहाटे ६ वाजेपर्यंतच्या मोजणीनुसार या सातही तलावांमध्ये मिळून तब्बल १,३०,४९८.१ कोटी लिटर इतका म्हणजेच ९०.१६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.या जलसाठ्यामुळे मुंबईकरांना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याबाबत दिलासा मिळणार आहे.




















