काँग्रेस व बहुजन शक्तीची सखोल चौकशीची मागणी….
कोपरगांव, दि. १८ : दीपक साटोटे
कोपरगाव तालुक्यातील अंजनापुर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बाजीराव बाचकर यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून दि. ८ ऑगस्ट रोजी नेवासा, तामतेळ वस्ती येथील राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मयत ग्रामसेवक यांच्या पत्नी यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत थेट आरोप केला आहे की, कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप दळवी व विस्तार अधिकारी बबन वाघमोडे हे त्यांच्या पतीला वारंवार मानसिक व आर्थिक छळ देत होते. त्यामुळेच त्यांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.
फिर्यादीप्रमाणे, मयताच्या दप्तरातून एक आत्महत्यापूर्व चिठ्ठी सापडली असून त्यातही संबंधित अधिकाऱ्यांवर थेट जबाबदारी टाकलेली आहे. आत्महत्येच्या रात्री बाचकर यांनी या दोन्ही अधिकाऱ्यांना वारंवार फोन केले, मात्र प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती मोबाईल कॉल डिटेलमधून उघड झाली आहे. शिवाय मृत्यूपूर्वी सहकारी ग्रामसेवकासोबतच्या फोन संभाषणातही त्यांनी अधिकाऱ्यांच्या छळामुळे आत्महत्या करीत असल्याचे स्पष्टपणे सांगितल्याचे समोर आले आहे.
या घटनेनंतर मयताच्या पत्नी व कुटुंबीयांनी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. तसेच कोपरगावातील काँग्रेस किसान सेलचे विजय जाधव आणि बहुजन शक्ती संस्थेचे कार्याध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी कोपरगाव पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून या प्रकरणाची सखोल चौकशी जलदगतीने पूर्ण करून दोषींना शिक्षा करण्याची मागणी केली आहे.




















