पैठण, दि.२४. ( अभिजीत सोनवणे )
पैठण येथील जायकवाडी नाथसागर धरणावर महाविकास आघाडी तर्फे जलपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. खासदार डॉ. कल्याण काळे, माजी राज्यमंत्री अनिल पटेल, माजी खासदार चंद्रकांत खैरे व माजी आमदार संजय पा. वाघचौरे यांच्या हस्ते गोदावरी मातेला साडी–चोळी अर्पण करून विधिवत पूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना खासदार डॉ. कल्याण काळे म्हणाले की, “सध्या जायकवाडी धरणातून पाणी सोडले जात आहे. हेच पाणी खेरडा कालव्यात सोडले गेले तर तालुक्यातील शेतकरी व नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.”
माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, “धरणात पाणी असतानाही वेळेवर सोडण्यात येत नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही रस्ता रोको आंदोलन केले, गुन्हेही दाखल झाले. पैठण सोसायटीने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. आता वरील धरणातून पाणी सोडले गेले आणि विरोधकांच्या हस्ते पूजन झाले. त्यामुळे आमच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी परिस्थिती झाली. म्हणूनच आम्ही भूमिपुत्र आणि आंदोलनकर्त्यांच्या हस्ते जलपूजन केले आहे.”
माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी या वेळी सांगितले की, “माजी मुख्यमंत्री स्व. शंकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नांमुळेच जायकवाडी धरण उभारले गेले असून या प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ मराठवाड्याच्या शेतकऱ्यांना मिळतो आहे.”
या जलपूजन सोहळ्यास माजी नगराध्यक्ष व शिवसेना नेते दत्ता गोर्डे, माजी जि.प. अध्यक्ष हरिश्चंद्र लघाने, काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, प्रदेश सचिव रविंद्र काळे, मराठवाडा ओबीसी विभाग अध्यक्ष कांचनकुमार चाटे, काँग्रेस तालुका अध्यक्ष विनोद पा. तांबे, शिवसेना तालुका प्रमुख मनोज पेरे, माजी सभापती मोहम्मद हनीफ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गुलदाद पठाण, शहराध्यक्ष निमेश पटेल, शिवसेना शहरप्रमुख अजय परळकर, माजी नगराध्यक्ष राखिताई परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष उमेश पंडूरे, तसेच विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















