पुणे, दि.२७ : ( सतीश गायकवाड )
रस्त्यापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सातत्याने लढा देऊन सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा वडार समाजाच्या वतीने पुण्यात भव्य सत्कार करण्यात आला. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या कार्यक्रमात ॲड. आंबेडकर यांच्या हस्ते सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी यांचाही सत्कार करण्यात आला.

सत्कारानंतर बोलताना ॲड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले,
“मी सोमनाथ सूर्यवंशी यांना अभिवादन करतो. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबाने कोणत्याही दबावाला बळी न पडता ठाम भूमिका घेतली. त्यामुळेच कायद्याच्या त्रुटी उघड झाल्या आणि ताकदीने लढता आले.”
त्यांनी स्पष्ट केले की, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीत झालेल्या मृत्यूनंतर आता कोर्ट नियमावली तयार करणार आहे. यामुळे देशभरातील कोठडीत होणारे मृत्यू कमी होण्याची शक्यता आहे.

या प्रकरणाबद्दल ॲड. बाळासाहेब आंबेडकर म्हणाले,
“राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात पोलिसांच्या बाजूने उभे राहिले. यावरून हे सरकार पीडितांपेक्षा पोलिसांच्या बाजूने आहे, हे स्पष्ट झाले. दोषी पोलिसांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आमचा लढा सुरू राहील.”
या प्रकरणी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन झाले असून, त्याच्या कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
बाळासाहेब आंबेडकर हीच ताकद” – अनिल अण्णा जाधव
या कार्यक्रमाचे आयोजन वडार समाजाचे नेते व वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष अनिल नारायण जाधव यांनी केले होते. राज्यभरातून वडार समाजातील नेते, कार्यकर्ते आणि माता-भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होत्या.
मनोगत व्यक्त करताना अनिल अण्णा जाधव म्हणाले,
“बाळासाहेब आंबेडकर ही एक ताकद आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे वडार समाजाच्या प्रश्नांना राजकीय ताकद मिळाली आहे. मी महाराष्ट्रभर फिरून वडार समाजाचे प्रश्न वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मांडले आणि त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.”
या भव्य सत्कार सोहळ्याला वडार समाजातील असंख्य नागरिक, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या लढ्याला मिळालेला न्याय व त्याबद्दल झालेला गौरव समाजासाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.




















