मुंबई, दि.१ : अजय मगरे
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ अंतर्गत दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेल्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यभर जिल्हास्तरावर सविस्तर आढावा बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली.
जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्व दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तक्रारी व प्रश्नांचे तत्काळ निराकरण करण्याच्या उद्देशाने या बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. या बैठका जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपाध्यक्ष म्हणून पार पडणार आहेत. बैठकीत मांडण्यात आलेल्या तक्रारी, त्यावर घेण्यात आलेले निर्णय तसेच करण्यात आलेली कार्यवाही यांचा सविस्तर अहवाल आयुक्त, दिव्यांग कल्याण आणि शासनास सादर करण्यात येणार असल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले.
बैठकीदरम्यान शासनस्तरावर निर्णय आवश्यक असलेल्या मुद्द्यांसाठी स्वतंत्र प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. यामुळे दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यविषयक गरजांचा विचार करून सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सहकार्याने विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला तसेच आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येणार असून, या उपक्रमामुळे दिव्यांग अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडविता येतील, असा विश्वास सचिव तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला.














