तिकीट दरांची लूट थांबवा; परिवहन मंत्र्यांचा थेट आदेश
मुंबई -मंगेश म्हात्रे
प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारून आर्थिक लूट करणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांवर राज्य सरकारने आता कठोर भूमिका घेतली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट इशारा देत, “प्रवाशांची लूट कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
अनधिकृत मोबाईल ॲप्सच्या माध्यमातून सुरू असलेल्या बेकायदेशीर बुकिंग आणि मनमानी भाडेवाढीवर लगाम घालण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत सह परिवहन आयुक्तांसह सुराज्य अभियानाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला असून, समिती लवकरच सविस्तर अहवाल सादर करणार आहे.
राज्यात अनेक खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या नियम धाब्यावर बसवून प्रवाशांकडून अतिरिक्त पैसे उकळत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. विशेषतः सुट्ट्या, सण आणि आपत्कालीन काळात तिकीट दर गगनाला भिडत असल्याने सामान्य प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी होती. आता या सर्व प्रकारांवर परिवहन विभागाची करडी नजर राहणार आहे.
याशिवाय बसस्थानकांवरील सुविधा, स्वच्छता आणि संपर्क यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. १ जूनपासून राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे मोफत करण्यात येणार असल्याची मोठी घोषणाही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे खासगी बस ऑपरेटर्स आणि अवैध ट्रॅव्हल ॲप्सवर मोठा दबाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

















