मुंबई : मंगेश म्हात्रे
सायनमधील गुरु तेग बहादुर नगर (जी.टी.बी. नगर) समूह पुनर्विकास प्रकल्पाला अखेर वेग मिळाला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे येथील रहिवाशांना ६३५ चौरस फुटांची आधुनिक आणि सुसज्ज घरे मिळणार असून प्रकल्पाचा विकास किस्टोन रिअल्टर्स (रुस्तुमजी समूह) यांच्या माध्यमातून केला जाणार आहे.
म्हाडा आणि कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी यांच्यात त्रिपक्षीय विकास करार पूर्ण झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयात म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत हा महत्त्वाचा करार करण्यात आला.
सुमारे ११.२० एकर जागेवर उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पात ३९ ते ४८ मजली तीन आधुनिक निवासी टॉवर्स उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पातून सुमारे १२०० लाभार्थ्यांना विनामूल्य ६३५ चौरस फुटांची सदनिका मिळणार आहे. यासोबतच गेटेड कम्युनिटी, बहुमजली पार्किंग, हिरवळ, तसेच आधुनिक जीवनशैलीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
बांधकामास प्रारंभ प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पात्र रहिवाशांना दरमहा २० हजार रुपये भाडे अनुदान दिले जाणार आहे. तसेच प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुढील पाच वर्षे इमारतींची देखभाल आणि व्यवस्थापनाची जबाबदारी म्हाडा पार पाडणार असल्याचे सांगण्यात आले.
विशेष म्हणजे २०२० मध्ये येथील इमारती धोकादायक घोषित झाल्यानंतर त्या पाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर रहिवाशांच्या मागणीनुसार हा पुनर्विकास प्रकल्प म्हाडामार्फत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक सुविधांमुळे जी.टी.बी. नगर पुनर्विकास प्रकल्प भविष्यातील पुनर्विकास योजनांसाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे म्हाडाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.




















