पैठण,दि.१५.( अभिजीत सोनवणे )
नाथषष्ठी यात्रेदरम्यान उभारण्यात आलेल्या बुट पाळण्यात बिघाड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाळणा जास्त वेगाने चालवल्याने तो अचानक जोराने फिरू लागला आणि लगेच बंद पडला. त्यामुळे पाळण्यात बसलेल्या नागरिकांचा तोल जाऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.
या घटनेत शेवगाव येथील एका पत्रकाराच्या कुटुंबातील दोन जणांना मुका मार लागून किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचा आरोपही नागरिकांकडून करण्यात येत आहे.
घटना घडल्यानंतर पाळणा चालविणारे दोघेही लोकांच्या भीतीने मौत्याचा कुवा (मौत का कुआ) परिसराकडे फरार झाल्याचे सांगितले जात आहे. सध्या संबंधित बुट पाळणा बंद ठेवण्यात आला असून काही दलाल त्या ठिकाणी थांबून फरार झालेल्या व्यक्तींची वाट पाहत असल्याचेही नागरिकांनी सांगितले.
प्राथमिक पाहणीत असे लक्षात आले की पाळण्याच्या खाली लहान-मोठ्या दगडांचा आधार देण्यात आला होता. पाळणा सुरू झाल्यानंतर हा आधार सटकून संपूर्ण पाळणा रुळावरून खाली घसरला, त्यामुळे पाळण्यात बसलेल्या नागरिकांना दुखापत झाली.
श्री संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी शेवगावहून आलेल्या भाविकांना या घटनेचा धक्का बसला. या परिसरात अजूनही जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की रात पाळणा, बुट पाळणा, झोका पाळणा, ब्रेक डान्स अशा कोणत्याही मनोरंजनाच्या पाळण्यात बसू नये तसेच त्या परिसरात जाणे टाळावे, अन्यथा गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.




















