मुंबई – मंगेश म्हात्रे
मुंबई पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या थराराने हादरली आहे! अपहरण करून कोट्यवधींची जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा अँटॉप हिल पोलिसांनी अवघ्या ६ तासांत पर्दाफाश करत ६ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या थरारक कारवाईत केवळ मोठा गुन्हा उघड झाला नाही, तर मुंबई ते गोवा असा पसरलेला गुन्हेगारी साखळीचा धक्कादायक धागाही समोर आला आहे. पोलिसांच्या वेगवान अॅक्शनमुळे या टोळीमागील आणखी मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
विरार पश्चिम येथे राहणारे श्रवण लक्ष्मण रावल (वय ४५) हे अँटॉप हिल परिसरातून चालत जात असताना चार अज्ञात इसमांनी त्यांचे अपहरण करत जबरदस्तीने वाहनात बसवले. आरोपींनी त्यांना धमकावत त्यांच्या जवळील सुमारे ३२ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम लुटली आणि त्यानंतर घाटकोपर परिसरात सोडून दिले. या घटनेनंतर अँटॉप हिल पोलिस ठाण्यात संबंधितांविरुद्ध दरोडयाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा अतिशय गुंतागुंतीचं असल्याने व गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने कोणतेही धागेदोरे प्राप्त होत नसल्याने. फिर्यादीच्या कंपनीमधून मागील वर्षभरात नोकरी सोडून गेलेल्या ८ लोकांची माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून एका संशयित इसमाची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. सदर इसमास गुप्त बातमीदारमार्फत ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने व त्याच्या इतर ७ साथीदारांनी मिळून गुन्हा केला असल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आतापर्यंत एकूण ६ आरोपींना अटक केली आहे. मुंबई ते गोवा असा गुन्हेगारीचा थेट कनेक्शन समोर आल आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये राहुल एकनाथ गायकवाड (वय ३०), इरफान अली अहमद अली खान (वय ३३), विवेक विलास काकडे (वय ३२), संतोष वसंत मळेकर (वय ४४), स्वनील चंद्रकांत पाटील (वय ३४) आणि मोहम्मद रिजवान अन्सार (वय ४१) यांचा समावेश आहे. यापैकी दोन आरोपींना नालासोपारा येथून, तीन आरोपींना गोवा राज्यातून तर एकाला कुर्ला नेहरू नगर येथून अटक करण्यात आली. या कारवाईदरम्यान आरोपींकडून एकूण २९ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
अँटॉप हिल पोलिसांच्या विशेष पथकाने अवघ्या काही तासांत ही कामगिरी फत्ते करत गुन्हेगारांना धडा शिकवला आहे. मात्र, या टोळीचे आणखी धक्कादायक कारनामे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पुढील तपास अधिक वेगाने सुरू आहे.




















