मुंबई | प्रतिनिधी
अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण आणि सामाजिक वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत. बीड ते मुंबई लाँग मार्चच्या सांगता सभेत डॉ. सिद्धार्थ शिनगारे यांनी सरकारला थेट इशारा देत, “उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ मागे घ्या, अन्यथा ३१ जुलै रोजी महाराष्ट्र बंद पुकारला जाईल,” अशी घोषणा केली.
चैत्यभूमी येथे झालेल्या सभेत बोलताना शिनगारे म्हणाले की, सरकारने तातडीने उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबविण्याची अधिकृत घोषणा केली, तर महाराष्ट्र बंदचा निर्णय मागे घेण्यास आम्ही तयार आहोत. मात्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
ते पुढे म्हणाले, “मुंबई आणि पुणे बंद झाले, तर तो महाराष्ट्र बंदच ठरेल. आमचा संघर्ष सामाजिक न्यायासाठी असून सरकारने याची गंभीर दखल घ्यावी.”
बीड ते मुंबई लाँग मार्चला राज्यभरातून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल त्यांनी आंदोलक आणि नागरिकांचे आभार मानले. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करत, “आम्ही भीमाची औलाद आहोत, कुणालाही घाबरणारे नाही. आमच्या नादी कोणी लागू नये,” असे ठाम शब्दांत सांगितले.
दरम्यान, अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर राज्यात वातावरण तापले असून, सरकार याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सरकारच्या निर्णयावर पुढील आंदोलनाची दिशा निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




















