ठाणे, दि.३०.( अजय मगरे )
आषाढ पौर्णिमा व गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, ठाणे महानगर जिल्हा अंतर्गत अंबिका नगर-२ शाखेच्या वतीने वर्षावास प्रवचनमाला २०२६ चा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला. शाखाध्यक्ष सुशांत साबळे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या प्रमुख आदरणीय सुप्रियाताई कासारे यांनी “विश्वगुरू तथागत भगवान बुद्ध” या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण, विचारप्रवर्तक आणि प्रभावी प्रवचन देत उपस्थितांना धम्माचा संदेश दिला.
कार्यक्रमानिमित्त विश्वरत्न मित्र मंडळाच्या वतीने उपस्थित धम्म उपासक-उपासिकांना खीरदान करण्यात आले. तसेच ठाणे महानगर जिल्हा शाखेचे पर्यटन सचिव नामदेव झिने गुरुजी यांनी वर्षावास प्रवचनमालेसाठी ५ हजारांचे धम्मदान जाहीर करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवला. ही रक्कम शाखेचे कोषाध्यक्ष पप्पू गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी ठाणे महानगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष वसंत मोरे गुरुजी, ज्येष्ठ नेते सुखदेव उबाळे, महिला उपाध्यक्षा शोभाताई काळे, जिल्हा सचिव एल. आर. मोरे गुरुजी, वंचित बहुजन आघाडीच्या उपाध्यक्षा छायाताई बच्चुटे, आरपीआय ठाणे जिल्हा अध्यक्षा विमलताई सातपुते, महिला सचिव शांताबाई आठवले, नंदाताई सोनवणे यांच्यासह विभागातील मोठ्या संख्येने धम्म उपासक-उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने अंबिका नगर परिसर धम्ममय वातावरणाने भारावून गेला.




















