उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश;
चितळसर-मानपाडातील सदनिका ३६ ते ४० लाखांत मिळण्याची शक्यता
*ठाणे : अजय मगरे*
ठाण्यातील चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या घरांच्या वाढलेल्या किमतीवरून सुरू असलेल्या वादाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. २०२०-२१ च्या रेडी रेकनर दरानुसारच या गृहप्रकल्पातील सदनिकांच्या किमती निश्चित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हाडाला दिले आहेत. त्यामुळे तब्बल ५१ ते ५२ लाख रुपयांपर्यंत पोहोचलेल्या घरांच्या किमती आता सुमारे ३६ ते ४० लाख रुपयांपर्यंत येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, आधीच्या सोडतीत निवड झालेल्या ४३४ लाभार्थ्यांना कायम ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याने त्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
चितळसर-मानपाडा येथील म्हाडाच्या गृहप्रकल्पातून १,१७३ घरे प्राप्त झाली होती. त्यापैकी ९३८ घरांची सोडत १४ जुलै २०२५ रोजी काढण्यात आली. मात्र, या सोडतीतील घरांच्या किमती २०२५-२६ च्या रेडी रेकनर दरानुसार निश्चित करण्यात आल्याने घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या. त्यामुळे विजेत्या लाभार्थ्यांसह नागरिकांमध्ये नाराजी पसरली होती. या वाढीव दरांविरोधात म्हाडाकडे तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक घेण्यात आली. बैठकीला म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल, कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी तसेच विजेत्या लाभार्थ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
*एकाच घराला दोन दर कशासाठी?*
चितळसर-मानपाडा प्रकल्पातील काही इमारतींना २०२०-२१ मध्ये अंशतः भोगवटा प्रमाणपत्र मिळाले होते. त्यावेळी रेडी रेकनरनुसार सदनिकांची किंमत सुमारे १० हजार रुपये प्रति चौरस फूट, म्हणजेच जवळपास ४० लाख रुपये निश्चित करण्यात आली होती. मात्र, प्रकल्पाला २०२५-२६ मध्ये पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर उर्वरित सदनिकांच्या किमती ५१ ते ५२ लाख रुपयांपर्यंत वाढविण्यात आल्या.
यामुळे एकाच इमारतीत आणि समान क्षेत्रफळाच्या सदनिकांना वेगवेगळे दर का, असा सवाल लाभार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आला. घरांच्या किमतींमध्ये सुसूत्रता आणून सर्व सदनिकांना समान दर लागू करण्याची मागणी करण्यात आली होती.
*४३४ लाभार्थ्यांना धक्का नाही*
एकाच इमारतीतील समान क्षेत्रफळाच्या सदनिकांना वेगवेगळे दर आकारण्याऐवजी २०२०-२१ चा रेडी रेकनर दर ग्राह्य धरून सरसकट किमती निश्चित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. तसेच, यापूर्वीच्या सोडतीत निवड झालेल्या आणि म्हाडाकडे स्वीकृती पत्रे जमा केलेल्या ४३४ लाभार्थ्यांना कायम ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे आधीच घराचे स्वप्न पाहणाऱ्या या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
*म्हाडास्तरावर दरांचा आढावा*
याबाबत कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी ‘बहुजन शक्ती न्यूज’शी बोलताना सांगितले की, चितळसर-मानपाडा गृहप्रकल्पातील विजेत्या लाभार्थ्यांनी घरांच्या किमती कमी करण्याची मागणी केली होती. या मागणीसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार घरांच्या किमती निश्चित करण्याबाबत म्हाडास्तरावर विचार- विनिमय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.




















