‘ट्रेसपास’च्या धमक्या, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
मुंबई | प्रतिनिधी
धारावीतील जास्मीन मिल कंपाउंड परिसरात अदानीच्या कंत्राटदाराच्या कामामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. रात्रंदिवस सुरू असलेली डंपरची वाहतूक, उखडलेले रस्ते आणि पाणी टाकल्यामुळे निर्माण झालेली निसरडी परिस्थिती यामुळे परिसरातील नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. अनेक जण घसरून पडल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.
स्थानिक नागरिकांनी या कामाबाबत जाब विचारण्यासाठी गेल्यानंतर अदानीच्या प्रतिनिधींनी चर्चेच्या नावाखाली आत बोलावून घेतले आणि नंतर पोलिसांना बोलावून ‘ट्रेसपास’चा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या भूमिकेबाबतही संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान, परिस्थितीची पाहणी करण्यासाठी मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड घटनास्थळी पोहोचल्या असता, शाहू नगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरही ‘ट्रेसपास’चा गुन्हा दाखल करण्याची भाषा केल्याचा आरोप करण्यात आला. लोकप्रतिनिधींशी अशा प्रकारे वागणूक दिल्याने राजकीय वातावरण तापले आहे.
धारावीच्या आमदार ज्योती गायकवाड यांनी विधानसभेत हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.




















