मुंबई | मंगेश म्हात्रे
दलितांवरील अन्याय-अत्याचाराविरोधात संघर्षाची मशाल पेटवणाऱ्या दलित पँथर संघटनेचा ५४ वा वर्धापन दिन शुक्रवारी (२९ मे) दादर येथील चैत्यभूमीवर उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यंदाच्या वर्धापन दिन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे दलित पँथरचे सहसंस्थापक ज. वि. पवार आणि ज्येष्ठ नेते अविनाश महातेकर हे अनेक वर्षांनंतर एकाच मंचावर उपस्थित राहिले.
वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘पँथर पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. माजी परिवहन मंत्री गंगाधर गाडे, रिपब्लिकन नेते मनोजभाई संसारे आणि ‘सम्राट’ वृत्तपत्राचे संस्थापक बबन कांबळे यांना पँथर पुरस्कार जाहीर करण्यात आला. तसेच डॉ. विनंती पोळ, डॉ. अर्चना हांडोरे आणि ज्युनिअर मिस इंडिया कॉन्फिडंट जिया गायकवाड यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संदेश विठ्ठल उमप यांनी बुद्ध-भीम गीतांच्या सादरीकरणातून पँथर चळवळीला अभिवादन केले. यावेळी ज. वि. पवार यांनी मार्गदर्शन करताना दलित पँथरच्या नावाने कार्यरत असलेल्या विविध संघटनांना एकत्र आणण्याचा निर्धार व्यक्त केला. तर अविनाश महातेकर यांनी पँथरच्या संघर्षमय इतिहासातील आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांना प्रेरित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश मोहिते यांनी तरुणांनी सामाजिक अन्यायाविरोधातील लढ्यात सक्रिय सहभाग घेत सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात प्रभावी आंदोलने उभारण्याचे आवाहन केले.
चैत्यभूमीवरील हा सोहळा पँथर चळवळीच्या ऐतिहासिक वारशाची आणि सामाजिक न्यायासाठीच्या संघर्षाची नव्याने आठवण करून देणारा ठरला.




















