मुंबईत होळी-धुलीवंदनानिमित्त विशेष वाहतूक मोहीम; १६,७२७ चालकांवर कारवाई
मुंबई : होळी आणि धुलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई वाहतूक पोलिसांनी राबवलेल्या विशेष वाहतूक मोहिमेत नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात आली. या विशेष मोहिमेत तब्बल १६,७२७ प्रकरणांची नोंद करण्यात आली असून एकूण १ कोटी ९९ लाख ९१ हजार ६५० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
सणाच्या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक रस्त्यावर उतरतात. त्यामुळे वाहतूक कोंडी, वेगमर्यादा उल्लंघन, मद्यपान करून वाहन चालवणे, हेल्मेटशिवाय दुचाकी चालवणे, ट्रिपल सीट प्रवास अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि हायवेवर नाकाबंदी करून तपासणी करण्यात आली.
सर्वाधिक कारवाई ‘स्पीड लिमिट’ आणि ‘हेल्मेट’ प्रकरणांवर
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, वेगमर्यादा उल्लंघनाची सर्वाधिक ४,४८६ प्रकरणे नोंदवली गेली. त्यानंतर हेल्मेटशिवाय वाहन चालवणाऱ्या ४,३१७ जणांवर कारवाई करण्यात आली. वाहतुकीच्या मुक्त प्रवाहात अडथळा निर्माण करणाऱ्या २,५३२ वाहनचालकांवरही दंडात्मक कारवाई झाली.
याशिवाय सिग्नल तोडणे (६१०), परवाना नसणे (४३१), ट्रिपल सीट (५३०), वन-वे मध्ये प्रवेश (२७८) अशी प्रकरणे समोर आली. चुकीच्या बाजूने वाहन चालवणाऱ्या २० जणांची प्रकरणे न्यायालयात पाठवण्यात आली.
सीसीटीव्ही व ई-चलन प्रणालीचा वापर
ही मोहीम सीसीटीव्ही कॅमेरे, ई-चलन प्रणाली आणि विशेष तपासणी नाक्यांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवण्यात आली. ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणांमध्ये संबंधित चालकांविरुद्ध न्यायालयीन कारवाई प्रस्तावित असून परवाना निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.




















