अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्ससाठी कार्यालये व पदभरतीला गती देण्याचे आदेश….
मुंबई, दि. ७ : अजय मगरे
राज्यात अमली पदार्थांच्या विक्री, वाहतूक आणि खरेदीवर कठोर नियंत्रण आणण्यासाठी कारवाया अधिक तीव्र कराव्यात, अशी स्पष्ट सूचना गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांनी संबंधित यंत्रणांना दिली आहे. मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी ही दिशा ठरवणारी महत्वपूर्ण भूमिका मांडली.
या बैठकीस गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंग, अमली पदार्थ विरोधी कृती दलाच्या पोलिस महानिरीक्षक शारदा राऊत, उपसचिव राहुल कुळकर्णी, तसेच पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे आदी अधिकारी उपस्थित होते.
राज्यमंत्री कदम यांनी सांगितले की, राज्य शासनाने स्थापन केलेल्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्ससाठी तातडीने पदभरती प्रक्रिया पूर्ण करून कार्यक्षमता वाढवावी. या दलांसाठी प्रदेशीय कार्यालयांची स्थापना, जागा निश्चिती, तसेच कार्यालय सुरू करण्यासाठी नियोजनबद्ध, कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यमंत्री कदम म्हणाले, “अमली पदार्थ प्रकरणांतील खटल्यांचे तातडीने निपटारा करण्यासाठी कार्यवाही करावी. प्रलंबित खटल्यांची नियमित व तपशीलवार माहिती सादर करण्यात यावी.” तसेच, अधिकाऱ्यांना विशेष भत्ते व पदोन्नतीचे वेतन मिळण्यासाठी तातडीने प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.
सागरी मार्ग हा अमली पदार्थ आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरला जातो, हे लक्षात घेता किनारपट्टीवरील विभागांना विशेष उपकरणे व वाहने उपलब्ध करून दिली जावीत. तसेच, सागरी किनाऱ्यांवर होणाऱ्या अमली पदार्थांच्या हालचालींवर विशेष लक्ष केंद्रित करून कारवाया अधिक प्रभावीपणे राबवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.




















