ठाणे,दि. २५ (अजय मगरे)
देशात १९७५ साली लागू झालेल्या आणीबाणीला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या सत्याग्रहींचा जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरी असलेले विशेष सन्मानपत्र प्रदान करण्यात आले.
सन्मानपत्रांचे वितरण अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी (सामान्य प्रशासन) सचिन चौधर, दिवंगत सत्याग्रहींचे वारस, आणीबाणीविरोधी सत्याग्रही, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितले की, “आणीबाणी ही भारतीय लोकशाहीतील एक काळा अध्याय होता. त्या विरोधात आवाज उठवणाऱ्या सत्याग्रहींनी अपार त्याग केला. त्यांचा सन्मान करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.”
कार्यक्रमाचे संयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. सन्मानप्राप्त सत्याग्रहींनी आपले अनुभव सांगत लोकशाहीच्या संरक्षणासाठी आजही सजग राहण्याचे आवाहन उपस्थितांना केले.




















