कोपरगावच्या संत ज्ञानेश्वर स्कूलच्या विद्यार्थ्यांची सिंहगडासह पुणे दर्शन सहल
कोपरगाव : दिलीप गायकवाड
पुस्तकात वाचलेला इतिहास प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहिला, तेव्हा तो मनावर कायमचा ठसा उमटवतो. हाच अनुभव कोपरगाव येथील संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला. शाळेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ऐतिहासिक व शैक्षणिक सहलीत विद्यार्थ्यांनी पुणे व परिसरातील वैभवशाली वारसा स्थळांना भेट देत इतिहासाचा जिवंत धडा घेतला. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदान दिनाचे औचित्य साधत, ‘गड आला पण सिंह गेला’ या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सिंहगड किल्ल्याला विद्यार्थ्यांनी भेट दिली.
संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रजी झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी संचालक विशालजी झावरे यांच्या नेतृत्वाखाली या सहलीचे नियोजन करण्यात आले होते.
इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात सिंहगडाची चढाई करत गड सर केला. तानाजी मालुसरे स्मारक, तानाजी कडा, तोफखाना, कल्याण दरवाजा व छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी येथे नतमस्तक होताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर अभिमान झळकत होता. शिक्षकांनी सांगितलेल्या इतिहासामुळे तानाजींचा पराक्रम विद्यार्थ्यांच्या डोळ्यांसमोर जिवंत झाला. गडावरील पारंपरिक पिठलं–भाकरीचा आस्वाद घेत सहलीची रंगत वाढली.
या सहलीत विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या विविध पैलूंचे दर्शन घेतले. देहू व आळंदी येथे संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी नमन केले. मोशी येथील १८०
फूट उंच छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा, तुळापूर येथील समाधीस्थळ व शनिवारवाडा येथे शिवकाळाचा इतिहास अनुभवला. पिंपरी–चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये विज्ञानाचे प्रयोग पाहिले, तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिर व रांजणगाव महागणपतीचे दर्शन घेत आध्यात्मिक ऊर्जा मिळवली.
यावेळी कार्यकारी संचालक विशाल झावरे म्हणाले, “विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता, त्यांच्यात साहस, शिस्त व आपल्या गौरवशाली इतिहासाप्रती आदर निर्माण व्हावा, हाच या सहलीचा उद्देश आहे. गड-किल्ल्यांचे संवर्धन ही काळाची गरज असून विद्यार्थ्यांनी यातून प्रेरणा घ्यावी.”
अत्यंत शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरणात पार पडलेल्या या सहलीसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. इतिहासाची शिदोरी घेऊन आनंदी चेहऱ्याने विद्यार्थी कोपरगावात परतले. या स्तुत्य उपक्रमाबद्दल पालकांनीही शाळेचे कौतुक केले.


















