कोपरगाव,दि.२९ ( दीपक साटोटे)
कोपरगाव तालुक्यातून वाहणारी गोदावरी नदी पुन्हा एकदा जीवंत झाली आहे. मार्च महिन्यात नदीचा प्रवाह पूर्णतः थांबला होता. मात्र, नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे गोदावरी नदीत पाणी आल्याने कोपरगावकरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्यात अवकाळी पावसाने जोर धरला असून, वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाचा फटका कोपरगाव तालुक्यालाही बसला. नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाची नोंद झाल्यामुळे नद्या आणि नाले पुन्हा वाहू लागले आहेत. त्याचा परिणाम म्हणून गोदावरी नदीतही काही प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे.
तथापि, या अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसापूर्वी पिके तयार अवस्थेत असताना आलेल्या वादळी पावसामुळे उन्हाळी बाजरी, कांदा, तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे.
गोदावरी नदी पुन्हा वाहू लागल्याने कोपरगाव शहरात समाधान व्यक्त होत असले तरी, पिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा आहे.




















