मुंबई, दि. १९ : अजय मगरे
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन हे शिक्षण, संघर्ष आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रेरणादायी उदाहरण आहे. बाबासाहेबांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन युवकांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन युनेस्को, पॅरिस येथील भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी विशाल व्ही. शर्मा यांनी केले.
दादर येथील चैत्यभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर राजदूत शर्मा प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, शिक्षणाच्या बळावरच बाबासाहेबांनी सामाजिक अन्याय, विषमता व भेदभावाविरोधात लढा दिला. त्यांची चिकाटी, बुद्धिमत्ता आणि ज्ञानसाधना आजच्या युवकांसाठी दिशादर्शक ठरते.
राजदूत शर्मा म्हणाले, जात, धर्म व पंथाच्या बंधनांपलीकडे जाऊन शिक्षण घेण्याचा संदेश बाबासाहेबांनी समाजाला दिला. आजच्या स्पर्धात्मक काळात युवकांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करून बौद्धिक विकास व कर्तृत्वनिर्मितीवर भर द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, पॅरिस येथील युनेस्को मुख्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण झाल्याने त्यांच्या विचारांचा जागतिक स्तरावर प्रसार होत असून ही घटना देशासाठी गौरवास्पद असल्याचेही राजदूत शर्मा यांनी सांगितले.




















