ठाणे,दि.२९ : अजय मगरे
ठाणे जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करून ते लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत दाखल करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. हे रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असून येथे आधुनिक यंत्रसामग्रीसह १०७८ नवीन पदभरतीची प्रक्रिया देखील राबवण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
मंत्रालयातील समिती कक्षात उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
९०० खाटांचे अत्याधुनिक रुग्णालय ; ठाणे जिल्हा रुग्णालय हे एकूण ९०० खाटांचे असून त्यात ५०० खाटांचे जिल्हा रुग्णालय, २०० खाटांचे महिला रुग्णालय आणि २०० खाटांचे संदर्भ सेवा रुग्णालय समाविष्ट आहे. सध्या या रुग्णालयाचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून डिसेंबरअखेरपर्यंत उर्वरित काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. या रुग्णालयासाठी १०७८ नवीन पदांची भरती केली जाणार असून आधुनिक यंत्रसामग्री बसविण्यावर भर दिला जाणार आहे.
यासाठी दर मंगळवारी मंत्रालयात नियमित आढावा बैठक घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी प्रधान सचिवांना दिले. हे रुग्णालय ठाणेसह रायगड, नवी मुंबई आणि पालघर जिल्ह्यांतील नागरिकांसाठी मोठा आधार ठरणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महिलांसाठी कर्करोग तपासणी मोहीम सुरू करण्याचे निर्देश;
राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणी मोहीम हाती घेण्यात यावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. महिलांमध्ये स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगाविषयी जागरूकता वाढवून उपचारापेक्षा प्रतिबंधात्मक उपायांवर भर देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. यासोबतच आरोग्य केंद्रांची स्थिती, औषधे आणि साहित्य याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आरोग्यमंत्री व सचिवांनी अचानक भेटी देण्याचेही निर्देश त्यांनी दिले.




















