कोपरगाव,दि.२५ : दिलीप गायकवाड
अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यातील शेतकरीवर्गाला राज्य शासनाने प्रसिद्ध केलेल्या मांदाडे अहवालावर आपली हरकत व अभिप्राय सादर करण्याचे आवाहन काँग्रेस तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांनी केले आहे.

शिंदे यांनी सांगितले की, “मांदाडे अहवाल मराठी भाषेत प्रसिद्ध करण्यात आला असून शेतकऱ्यांनी त्याचा सखोल अभ्यास करून शासनाला आपले मुद्दे कळवणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे हित जपण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने सहभाग नोंदवावा.”
यासंदर्भात शेतकऱ्यांनी आपले अभिप्राय व हरकती लेखी स्वरूपात अथवा ई-मेलद्वारे शासनाकडे पाठवाव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले. शासनाने यासाठी विशेष ई-मेल उपलब्ध करून दिले असून murra.maharashtra.gov.in किंवा dm.secretarymwrra.in या ई-मेल आयडीवर आपले मुद्दे पाठवता येणार आहेत.
शिंदे यांनी पुढे सांगितले की, “सर्व शेतकऱ्यांनी १८ सप्टेंबर २०२५ पर्यंत आपले अभिप्राय व हरकती शासनापर्यंत पोहोचवाव्यात. या प्रक्रियेत जितक्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा सहभाग होईल, तितके त्यांच्या हिताचे धोरण निर्णय प्रक्रियेत उमटेल.”
संपूर्ण शेतकरीवर्गाने सजग राहून आपली भूमिका शासनापर्यंत पोहोचवावी, असे स्पष्ट आवाहन शिंदे यांनी केले आहे.




















