कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा अधिकाऱ्यांना सज्जड इशारा; शेतकऱ्यांच्या तक्रारींची तातडीने दखल घेण्याचे निर्देश
मुंबई : अजय मगरे
खते खरेदी करताना शेतकऱ्यांना युरिया, डीएपीसोबत इतर रासायनिक खते घेण्याची सक्ती करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात आता कठोर कारवाई करा. राज्यात कृषी निविष्ठांच्या लिंकिंगला स्पष्ट मनाई असतानाही युरिया, डीएपी आणि इतर रासायनिक खतांचे सक्तीने लिंकिंग केले जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे लिंकिंग करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करा, असे स्पष्ट आदेश कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांना दिले.
मंत्रालयात नागपूर जिल्ह्यात युरिया, डीएपी खतांसोबत इतर रासायनिक खतांची सक्तीने लिंकिंग करून विक्री केली जात असल्याच्या तक्रारींबाबत बैठक झाली. या बैठकीत जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. वितरक कंपन्या, विक्रेते आणि उत्पादक यांच्यात लिंकिंगबाबत संगनमत आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
शेतकऱ्यांना खतांसाठी हेलपाटे नकोत!
खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दर्जेदार कृषी निविष्ठा सहज उपलब्ध झाल्या पाहिजेत. नागपूर विभागात यासाठी १३३ गुणनियंत्रण निरीक्षक आणि ६० तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. खत खरेदी करताना लिंकिंगचा प्रकार आढळल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या १८०० २३३ ४००० या टोल फ्री क्रमांकावर किंवा ९८२२४४६६५५ या क्रमांकावर तक्रार करावी, असे आवाहन जयस्वाल यांनी केले.
युरिया, खते आणि बियाण्यांचे वितरण सुरळीत करण्याची जबाबदारी कृषी अधिकाऱ्यांनी पार पाडावी. कृषी निविष्ठांची मागणी शेतकरी पोर्टलवर ऑनलाइन नोंदविण्याची सुविधा सुरू असली तरी शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी ऑफलाइन प्रक्रियाही सुरू ठेवावी, असे निर्देश देण्यात आले.
धाडपथके तैनात करा!
नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त होत असल्याने संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करा. धाडपथके तयार करून लिंकिंग करणाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश जयस्वाल यांनी दिले. राज्यस्तरावरही शेतकऱ्यांना तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
या उपाययोजनांची १५ ऑगस्टपर्यंत प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामसभांमध्ये याबाबत माहितीचे वाचन करण्यात यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
‘झटका मशिन’ वाटपात गैरप्रकार नको
वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी देण्यात येणाऱ्या ‘झटका मशिन’च्या वाटपातही योग्य लाभार्थ्यांची निवड करण्याच्या सूचना जयस्वाल यांनी केल्या. वन्यप्राण्यांचा वावर असलेल्या भागातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. तसेच झटका मशिन वाटपात कोणताही गैरप्रकार होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.




















