मुंबई, दि.१६ : प्रतिनिधी
राज्यात सामाजिक न्याय, समता आणि विकासाचा नवा अध्याय लिहिण्यासाठी शिवसेना (शिंदे गट) आणि रिपब्लिकन सेना यांनी आज औपचारिक युतीची घोषणा केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत नरिमन पॉइंट येथील महिला विकास मंडळाच्या सभागृहात ही घोषणा करण्यात आली.

यावेळी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, शिवसेना आमदार दिपक केसरकर, आमदार दिलीप लांडे, प्रवक्ते राहुल लोंढे, सहमुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे व इतर मान्यवर उपस्थित होते.
युतीची घोषणा करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “शिवसेना आणि रिपब्लिकन सेना या दोन्ही रस्त्यावर अन्यायाविरोधात लढणाऱ्या सेना आहेत. एक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालते, तर दुसरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या रक्ताचा. आजपर्यंत ‘कॉमन मॅन’ म्हणून काम केलं; आता ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ म्हणून काम करतो. संविधान आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर काम करत राहू.”
ते पुढे म्हणाले, “सत्तेचा उपयोग सर्वसामान्यांच्या आयुष्यात चांगले दिवस आणण्यासाठी व्हायला हवा. विचार, विश्वास आणि विकास या त्रिसूत्रीवर काम करायचे आहे. शिवशक्ती–भीमशक्तीची ही युती कार्यकर्त्यांचीच युती आहे, त्यामुळे नक्कीच यशस्वी होईल.”
यावेळी विरोधकांवर टीका करत शिंदे म्हणाले, “संविधान कधीच धोक्यात नव्हते, मात्र विरोधकांनी राजकीय स्वार्थासाठी खोटा प्रचार केला. आता त्यांचंच अस्तित्व धोक्यात आलं आहे. जोवर सूर्य–चंद्र आहेत, तोवर डॉ. बाबासाहेबांचं संविधान कायम राहील.” तसेच, इंदू मिल येथे “जगाला हेवा वाटेल असं भव्य स्मारक उभं राहील,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर म्हणाले, “या युतीमुळे राज्यात सामाजिक व राजकीय बदल घडतील. शिंदे यांनी आधीच वर्षावास कार्यक्रम घेऊन आंबेडकरी समाजाला सन्मान दिला, आता कार्यकर्त्यांना सत्तेत सामावून घेतील, अशी खात्री आहे.”
युतीनंतर दोन्ही पक्षांनी कार्यकर्त्यांना एकत्र येऊन राज्यभर विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले.




















