कोपरगाव बाजार समितीचे ऑडिट करा;काँग्रेस, विजय जाधव. कोपरगांव यांची मागणी
कोपरगाव : दि. ११.चंद्रकांत जोर्वेकर ,
भारतीय शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारा अमेरिका–भारत शेतीमाल आयात-निर्यात करार तात्काळ रद्द करण्यात यावा, तसेच कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन २०१५ ते २०२६ या कालावधीतील सर्व व्यवहारांचे सरकारी ऑडिट करण्यात यावे, अशी जोरदार मागणी ऑल इंडिया किसान काँग्रेस आहिल्यानगर जिल्ह्य उपाध्यक्ष, विजय जाधव कोपरगांव यांनी राज्यपाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
विजय जाधव, यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे पाठविलेल्या निवेदनात हा करार भारतीय शेतकऱ्यांसाठी घातक असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेतून भारतात येणाऱ्या शेतीमालावर शून्य टक्के आयात कर असून भारतीय शेतीमालावर मात्र मोठ्या प्रमाणात कर आकारला जात असल्याने भारतीय शेतकऱ्यांवर आर्थिक अन्याय होत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
अमेरिकेतील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सरकारी अनुदान मिळत असल्याने त्यांचा कांदा, मका, सोयाबीन, कापूस, दूध आदी शेतीमाल भारतात स्वस्त दरात येऊ शकतो. यामुळे भारतीय बाजारपेठेला मोठा फटका बसण्याची शक्यता असून देशातील मका, सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत येतील. तसेच दुग्ध व्यवसायावरही गंभीर परिणाम होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, कांद्यास हमीभाव जाहीर करणे, सर्व शेतीमालाला कायदेशीर हमीभाव देणे, आयात नियंत्रणाचे कठोर धोरण लागू करणे तसेच कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे २०१५ पासून आतापर्यंतचे सर्व व्यवहार शासनाच्या नियमांनुसार तपासून ऑडिट करावे, अशा मागण्या देखील निवेदनात करण्यात आल्या आहेत.
सरकारने या मागण्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अन्यथा शेतकरी आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.




















