कोपरगाव, दि. १९ : दीपक ससोटे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष काकासाहेब दशरथ खंबाळकर यांनी कोपरगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमानंतर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत आगामी निवडणुकांसाठी पक्षबांधणीवर भर दिला.
येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये — नगरपालिका तसेच महानगरपालिका — रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) भक्कमपणे उतरावी, यासाठी आतापासूनच तयारी सुरू करण्याचे आदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. स्थानिक पातळीवर संघटनात्मक कार्य वाढवून सामान्य जनतेशी संवाद प्रस्थापित करावा, यावर खंबाळकर यांनी विशेष भर दिला.
त्यांनी सांगितले की, “पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या जनतेशी थेट संपर्क साधून समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांवर आवाज उठवणे, ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. संघटन बळकट केल्याशिवाय राजकीय यश मिळत नाही.”
या संवाद दौऱ्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे जिल्हा व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















