नाम फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश; विरभद्रा नदीचे खोलीकरण फलदायी ठरले
पैठण, दि. २८ : प्रतिनिधी
पैठण तालुक्यातील मौजे नांदर येथे पिण्याच्या पाण्याचा व सांडपाण्याचा दीर्घकालीन प्रश्न अखेर सुटला आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विरभद्रा नदीच्या खोलीकरणाच्या कामामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, गावात आनंदाचे वातावरण आहे.
सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे खोलीकरण क्षेत्रात पाणी साचले होते, परंतु यामुळे पाण्याचा नैसर्गिक साठा वाढल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि सांडपाण्याचा निचरा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
गावातील पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून कायम होता. याआधी, साल २०१५ मध्ये बजाज फाउंडेशनच्या माध्यमातून दावरवाडी ते नांदर दरम्यान विरभद्रा नदीचे खोलीकरण करण्यात आले होते. त्या कामामुळेही परिसरातील पाणीसाठ्यात वाढ झाली होती.
नवीन सुरू असलेल्या खोलीकरणामुळे नांदरसह कौंदर, कुतुबखेडा, वडगाव, ब्राह्मगाव या शेजारील गावांनाही शेतीसाठी आवश्यक असा पाण्याचा पुरवठा सुयोग्यरित्या मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या कामाबाबत किशोर पाटील तांगडे (शेतकरी अभ्यासक, नाम फाऊंडेशन, पुणे) यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “या खोलीकरणामुळे नांदर, दावरवाडी व आजुबाजूच्या गावांना पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी आवश्यक पाणीपुरवठा होणार असून, संपूर्ण परिसरातील जलसंपत्तीचा प्रभावी उपयोग होईल.”




















