पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको; तीन हजार रुपये हमीभावाची मागणी
पुणे : अजय मगरे
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये हमीभाव द्यावा तसेच कमी दरात विक्री झालेल्या कांद्यासाठी अनुदान जाहीर करावे, या मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात विराट क्रांती महामोर्चा काढत पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.
आंदोलनादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत कांदा उत्पादक शेतकरी गंभीर संकटात सापडल्याचे सांगितले. “शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कांद्याला बाजारात कवडीमोल दर मिळत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांद्याला तीन हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव मिळेपर्यंत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस व महाविकास आघाडीचा संघर्ष सुरू राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंके, आमदार बापूसाहेब पठारे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार बाबाजी काळे, माजी आमदार अशोक पवार, पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
सपकाळ यांनी सरकारच्या कांदा खरेदी धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शासकीय खरेदीची घोषणा करूनही प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नसल्याचा आरोप करत कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांना योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात सरकारविरोधात तीव्र नाराजी असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.




















