‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ ठरले लोकाभिमुख उपक्रम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
ठाणे, दि.३१.( प्रतिनिधी )
ठाणे जिल्ह्यात लवकरच नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय तसेच दोन नवीन तहसील कार्यालये सुरू करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. तसेच ठाणेकरांच्या मालमत्ता व जमिनीवरील हक्क अधिक सुरक्षित करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गडकरी रंगायतनसमोरील शिवसमर्थ विद्यालय येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ कार्यक्रमात ते बोलत होते. या अभियानाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातील ७६ हजार कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा थेट लाभ देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभाग नागरिकांना जलद, पारदर्शक आणि सुलभ सेवा देण्यासाठी अनेक ऐतिहासिक निर्णय घेत आहे. बिगरशेती (NA) परवानगीची अट रद्द करणे, तुकडेबंदी कायदा मागे घेणे, २०११ पूर्वीच्या शासकीय जागांवरील घरांचे नियमितीकरण, तसेच राज्यातील सर्व फ्लॅटधारकांना स्मार्ट प्रॉपर्टी कार्ड देण्याची तयारी सुरू आहे.
यावेळी ठाणे आणि पालघर परिसरातील विविध विकास प्रकल्पांसाठी जमीन उपलब्ध करून देणे, अंबरनाथ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मीरा-भाईंदरमधील एमटीपी प्लांट, कोस्टल रोड, बीएसएनएल टॉवर्स, कृषी प्रकल्प आदींसाठी शासनाने घेतलेल्या निर्णयांचीही माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमात आमदार संजय केळकर, मंदाताई म्हात्रे, निरंजन डावखरे, विक्रांत पाटील, माधवी नाईक, रविंद्र फाटक, किसन कथोरे, कुमार आयलानी, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रणजीत यादव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील यांच्यासह विविध अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ‘सामाजिक अर्थसहाय्य योजना’, ‘वनहक्क कायदा’ आणि ‘गौण खनिज नियम’ या माहिती पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. विविध शासकीय योजनांतील लाभार्थ्यांना दाखले व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले, तसेच उल्लेखनीय कार्याबद्दल नायब तहसीलदार दिनेश पैठणकर यांचा सत्कार करण्यात आला.




















