सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती
मुंबई, दि.१२ : अजय मगरे
झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प (एसआरए) वर्षानुवर्षे रखडल्यामुळे हजारो कुटुंबांचे जीवन विस्कळीत झाले असून, स्थलांतरानंतर मूलभूत सुविधा न मिळाल्याने नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीतर्फे १३ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजता वांद्रे(पूर्व) येथील एसआरए कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे आणि महिला आघाडी मुंबई अध्यक्षा स्नेहल सोहनी करणार आहेत. ३५ पेक्षा अधिक एसआरए प्रकल्पग्रस्त संघटना या आंदोलनात सहभागी होणार असून, रखडलेले प्रकल्प मार्गी लागेपर्यंत लढा सुरू राहील, असा इशारा आयोजकांनी दिला आहे.
नुकत्याच झालेल्या बैठकीत एसआरए पीडितांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन मदत मागितली होती. नागरिकांच्या मते, आजवर कुठल्याही राजकीय पक्षाने या प्रश्नासाठी ठोस लढा दिला नसून, हा लढा फक्त वंचित बहुजन आघाडी लढू शकते, असा त्यांचा विश्वास आहे.
मुख्य मागण्या : रखडलेले सर्व एसआरए प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत.
भाडे थकबाकीची तात्काळ भरपाई करावी.
गैरवर्तन करणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाई करावी.
झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन वेळेत आणि योग्य ठिकाणी करावे.
एसआरए प्राधिकरणाने प्रकल्पांची प्रगती स्पष्टपणे जाहीर करावी.
बिल्डर-अधिकारी मिलीभगतीला आळा घालावा.
आवश्यक असल्यास शासनाने प्रकल्प ताब्यात घ्यावेत.
वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केले की, “एसआरए प्रकल्पग्रस्त हे प्रामुख्याने गरीब, शोषित आणि वंचित समाजातील असून, त्यांच्याशी होणारा अन्याय सहन केला जाणार नाही.”




















